आषाढी यात्रेत महिला वारकऱ्यांसाठी उभारणार जर्मन हँगर्स

सदस्या ॲड . निगडे यांच्या सूचनेला तात्काळ मंजुरी

पुणे : आषाढी यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या महिला वारकऱ्यांसाठी प्रत्येक पालखीतळावर यंदा प्रथमच भव्य जर्मन हँगर्स ( निवारा शेड ) उभारणी करण्यात येणार असून त्यामध्ये हजारो महिलांसाठी स्नान आणि प्रातर्विधीसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्य एडवोकेट माधवी निगडे यांच्या या सूचनेला तात्काळ मंजुरी मिळाली असून यंदाच्या आषाढीपासून ही व्यवस्था कार्यान्वित होईल.
आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री वारकरी महामंडळाची बैठक पार पडली. यावेळी सामाजिक न्याय नगर विकास मंत्री ना माधुरीताई मिसाळ तसेच पुणे विभागाच्या आयुक्ता शितल तेली उगले , सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी महामंडळाचे प्रतिनिधी तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती आळंदी , संत तुकाराम महाराज संस्थान देहू आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने सदस्य ॲड .माधवीताई निगडे यांनी जर्मन हँगर चा हा प्रस्ताव मांडला आणि त्याला तात्काळ मंजुरी देण्यात आली.
बैठकीत आगामी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा व पालखी महामार्गावरील वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या विविध सुविधांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्य ॲड. माधवीताई निगडे यांनी महिला वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला.

पालखी महामार्गावर महिला भाविकांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्यात यावेत. या निवारा केंद्रामध्ये कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र कक्ष, स्नान व स्वच्छतेसाठी आवश्यक व्यवस्था तसेच महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी सूचना त्यांनी बैठकीत मांडली. महिला वारकऱ्यांच्या वाढत्या सहभागाचा विचार करता ही सुविधा अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

ॲड. माधवीताई निगडे यांनी मांडलेल्या या सूचनेची दखल घेत l राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ तसेच विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी तत्काळ सकारात्मक निर्णय घेत या प्रस्तावास मंजुरी दिली. त्यानुसार यंदाच्या आषाढी यात्रा 2026 मध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये प्रथमच महिला भाविकांसाठी स्वतंत्र निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो महिला वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ व सन्मानजनक सुविधा उपलब्ध होणार असून त्यांच्या आरोग्य, स्वच्छता व सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. तसेच महिला भाविकांना प्रवासादरम्यान आवश्यक गोपनीयता आणि मूलभूत सुविधा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

आषाढी यात्रा अधिक सुकर, सुरक्षित व सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या या निर्णयाचे वारकरी संप्रदाय, महिला भाविक तसेच विविध सामाजिक संघटनांकडून स्वागत करण्यात येत आहे. महिला वारकऱ्यांच्या गरजा ओळखून त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हा निर्णय एक महत्त्वपूर्ण आणि स्वागतार्ह पाऊल मानला जात आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या सदस्य ॲड. माधवीताई निगडे यांनी मांडलेल्या या विधायक सूचनेमुळे यंदाच्या आषाढी यात्रेत महिला वारकऱ्यांसाठी एक नवी आणि उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here