* 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचारी
* 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्र
* 16 ठिकाणी वाहन तळ; सुमारे 10 ते 11 हजार वाहनांची पार्कीग व्यवस्था
* 12 वॉच टॉवर; पाच अतिक्रमण पथके
पंढरपूर दि.30:- कार्तिकी शुद्ध एकादशी 02 नोव्हेंबर 2025 रोजी असून, या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.


कार्तिकी वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षा तसेच अतिक्रमण मोहिमेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी 3 हजार 57 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिक्षक, एक अप्पर पोलीस अधिक्षक, 12 पोलीस उपअधिक्षक, 30 पोलीस निरिक्षिक, 127 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 1 हजार 386 पोलीस अंमलदार व 1 हजार 500 होमगार्ड तसेच 02 एसआरपीएफ कंपनी, 04 बीडीएस पथके, आरसीपी दोन पथके, क्युआरटी दोन पथके, आपत्कालिन परिस्थिती हातळण्यासाठी प्रशिक्षित 10 कार्ट पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच जलप्रवासी वाहतुकीवर नियंत्रण राहण्यासाठी जलसंपदा विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने 08 ठिकाणी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नदीपात्र, 65 एकर, महाव्दार, महाव्दार घाट, पत्राशेड यासह आदी ठिकाणी 12 वॉच टॉवर उभारण्यात आले आहेत. वारकरी भाविकांना संरक्षण देण्यासाठी तसेच चोरी रोखण्यासाठी माऊली स्कॉडची स्थापन करण्यात आली असून यामध्ये वारकरी व नागरिकांच्या वेशात पोलीस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच वारकरी भाविकांना रहदारीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी 05 अतिक्रमण पथके नेमण्यात आली आहेत. वारकऱ्यांच्या मदतीसाठी सावरकर चौक, शिवाजी चौक, चंद्रभागा वाळवंट तसेच अंबाबाई पटांगण आदी 7 ठिकाणी तीर्थक्षेत्र पोलीस मदत केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. वारकरी भाविकांना आवश्यक सूचना देण्यासाठी ध्वनीक्षेपन यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशान्वये जड वाहतुक शहराबाहेरुन वळविण्यात आली आहे . तसेच वाहतुक नियमनासाठी शहराबाहेर 12 तर शहराअतर्गंत 10 ठिकाणी डायव्हरशन पॉईट सुरु करण्यात आले आहे. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी शहरात व शहराबाहेर 16 ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असून या ठिकाणी सुमारे 10 ते 11 हजार वाहनांची पार्कींग व्यवस्था होणार आहे. वारकरी भाविकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डगळे यांनी केले आहे.



















