शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा- मनोज जरांगे पाटील

पंढरपूर ( प्रतिनिधी )- :
शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि राज्यातील शेतीसमोरील गंभीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.रोहित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाची माहिती मनोज जरांगे पाटील यांना दिली. राज्यातील अनेक शेतकरी नैसर्गिक संकटे, उत्पादन खर्चातील वाढ आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी व्यापक कर्जमाफीची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शेतकरी हा देशाचा कणा असून त्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून विकासाची भाषा करता येणार नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने संवेदनशील भूमिका घेत ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.
पंढरपूरातील ही भेट केवळ दोन नेत्यांची राजकीय भेट नसून, राज्यातील शेतकरी प्रश्नांबाबत वाढत्या असंतोषाचे प्रतीक मानली जात आहे. कर्जबाजारीपणा, उत्पादन खर्चातील वाढ, हवामान बदलाचे संकट आणि हमीभावाचा प्रश्न यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. अशा परिस्थितीत कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राजकारणापलीकडे जाऊन सर्वपक्षीय सहमती निर्माण होणे ही काळाची गरज आहे. पंढरपूरातील मनोज जरांगे पाटील आणि रोहित पवार यांची भेट शेतकरी हिताच्या प्रश्नांवर व्यापक जनआंदोलनाची नांदी ठरते का, याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी सरकारने तातडीने सकारात्मक आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशीच जनभावना या आंदोलनातून व्यक्त होताना दिसत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here